कानमंत्र
कागदाची “नाव” होती….
पाण्याचा “किनारा” होता..
मित्रांचा “सहारा” होता
खेळण्याची मस्ती होती
मन हे “वेडे” होते
“कल्पनेच्या” दुनियेत जगत होते..
कुठे आलो या “समजूतदारीच्या” जगात …
यापेक्षा भोळे ते “बालपणच” सुंदर होते….
कोण्या अज्ञात कवीचे शब्द आज मन:पटलावर सहजच कोरले गेले आणि मन हळवे झाले. किती सुंदर होता ना तो काळ ! प्रत्येक क्षण असा
अगदी काल घडल्यासारखा डोळ्यासमोरून जात आहे. अर्थातच आयुष्याची
रंगीत तालीमच आहे की तो सुवर्णकाळ.
प्रत्येकाच बालपण जरी वेगळे असले तरी ते बालमन काही
अंशी समानच असते. बालमनाच्या निरागसतेत एक मायेचा
ओलावा होता. झाल्या गोष्टी तिथल्या तिथे सोडवल्या जात. एक लटका
रुसवा तर आईच्या प्रेमळ बोलावण्याने निघून जायचा. मोठ्या माणसांशी डोक्यावरून फिरवलेला मायेचा हात
तेव्हा एक पुरस्कार वाटायचा. खिशात खोटे पैसे असतानाही
लखपती असल्यासारखे वाटायचे. कारण आहे त्या गोष्टीत फक्त
आनंद लुटायचा एवढेच तर माहित होते त्या बालमनाला. घरच्यांच्या मागे
लागून त्यांच्यामागे जाण्याचा हट्ट करणे त्यांनी नाही म्हटल्यावर आपला रुसवा एक छोट्याशा
चॉकलेटने निघून जायचा आणि आता वाईट वाटते. का ? कारण आपण आपल्यातले
बालमन कुठेतरी दडवलेय.
आजही ते बालमन आपल्याकडे आहे पण आता मोठे झाल्याने
त्या बालमनाला दडवतो तो अतिसमजूतदारपणा. बालपणी पाहिलेल्या
स्वप्नांचाच पाठलाग आपण करतोय परंतू त्या नादात त्या प्रवासाची मजा घ्यायला विसरतोय म्हणूनच बालपणीचे
दिवस जरी हरवले असले तरी बालमन जोपासायला विसरतोय. का ? तर आता मोठे
झालो ना ! जबाबदारी आली, पुढ्यात भविष्य आहे, पण या धावपळीत स्वतःच कुठेतरी हरवतोय. भूतकाळाचा ताण आणि भविष्याची चिंता करत वर्तमानात
जगायचेच राहून जातेय. आपण ते दिवस तर परत नाही जगू
शकणार पण आपल्यातल्या त्या बालमनाला नक्कीच जपू शकतो. जेणेकरून वर्तमानात जगण्याचा एक कानमंत्र आपल्या
हातात असेल.

Comments
Post a Comment